Translate

Friday, January 28, 2011

आर्थिक कुवत पाहूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दे- हा मोलाचा उपदेश मला त्या म्हातारीने दिला.

अमोल अ. अन्नदाते यांचा वैद्यकीय व्यावासिक नित्तिमतेच्या लेख मालिकेतील दूसरा लेख डॉक्टर यांच्या सौजन्याने अनावश्यक शस्त्रक्रियांविषयी चर्चा करताना एक गोष्ट सुरुवातीलाच अधोरेखीत करणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया अनावश्यक असतात असे म्हटले तर मग वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सा विभागच जन्माला का आला? असे म्हणावे लागेल. पण मात्र साधारणत: १० ते २० टक्के शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियासदृश प्रोसिजर्स अनावश्यक असू शकतात.
नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील अनावश्यक शस्त्रक्रियांच्या प्रथेवर दृष्टिक्षेप टाकणारा विक्रम गोखलेंचा ‘आघात’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विख्यात शल्यचिकित्सक एम.एस.चे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरला एका २२ वर्षांच्या मुलींच्या दोन्ही ओवरिज (अंडाशय) काढून टाकण्याचा आदेश देतात. ती डॉक्टर एक ओवरी प्रिझर्व केली जाऊ शकते असा युक्तिवाद करत दोन्ही ओवरीज काढण्यास नकार देते.




दुसऱ्या निवासी डॉक्टराकरवी ती ओवरी काढून विख्यात शल्यचिकित्सक स्वत:चेच खरे करतात. पण त्यांच्या विरोधात बंड करून ती डॉक्टर अनावश्यक शस्त्रक्रियेच्या विरोधातला तिचा लढाजिंकते. ‘आघात’च्या निमित्ताने दोन गोष्टींबद्दल खूप आनंद वाटला. पहिली गोष्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तींविषयी घरातल्या माणसांपेक्षा सोनाराकडून कान टोचले गेले. सहसा आम्ही डॉक्टर जेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील अनिष्ट चालीरीतींविषयी लिहितो बोलतो तेव्हा आमच्या क्षेत्रातून- ‘कशाला आपल्या घरातील भांडण चव्हाटय़ावर आणताय, अशा गोष्टींचे प्रमाण खूपच कमी आहे हो आता असे कुठले क्षेत्र राहिले आहे ज्यात अनैतिकता नाही?’ - अशा प्रतिक्रिया येतात. अशा गोष्टींचे प्रमाण वैद्यकीय क्षेत्रात कितीही कमी असले आणि दुसऱ्या क्षेत्रातील उदाहरणे देऊन आम्ही स्वत:च्या चुकांवर किती पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरी अशा चालीरितींचा मोठय़ा प्रमाणावर निषेध व्हायलाच हवा. दुसऱ्या ज्या गोष्टीचा आनंद वाटतो ती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अनिष्ट चालीरितींवर असे रोखठोक चित्रपट येऊ लागलेत. त्यातूनच या अनावश्यक शस्त्रक्रिया रोखायच्या कशा? हा प्रश्न ओपनली चर्चेला आलाय.
अनावश्यक शस्त्रक्रियांविषयी चर्चा करताना एक गोष्ट सुरुवातीलाच अधोरेखित करणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया अनावश्यक असतात असे म्हटले तर मग वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सा विभागच जन्माला का आला? असे म्हणावे लागेल. पण साधारणत: १० ते २० टक्के शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियासदृश प्रोसिजर्स अनावश्यक असू शकतात. त्यातच इमर्जन्सी शस्त्रक्रिया म्हणजेच जीव वाचवण्यासाठी केलेल्या तातडीच्या शस्त्रकियांपेक्षा इलेक्टिव म्हणजे आधी प्लॅन केलेल्या शस्त्रक्रिया अनावश्यक असण्याचे प्रमाण जास्त असते. इलेक्टिव शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयापासून ते ती होईपर्यंत काही काळ जातो. या काळात ही शस्त्रक्रिया आवश्यक आहे की अनावश्यक यावर संशोधन करण्यासाठी रुग्णाने नेमके काय करावे, कसे जागरुक व्हावे हे आपण रुग्णांना सांगायला हवे. वैद्यकीय विद्यार्थी असताना शस्त्रक्रियांविषयी दोन गोष्टी आवर्जून शिकवल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे ''It is better to feel ashamed of finding nothing on opening abdomen rather than feeling ashamed of missing something by not opening it''. म्हणजेच अ‍ॅब्डोमनमध्ये काही तरी जीवघेणा सर्जिकल प्रॉब्लेम असण्याची शंका असताना ते उघडून काहीच सापडले नाही तर काय करावे या लाजेपोटी अ‍ॅब्डोमन न उघडून काही तरी निदान हुकवणे जिकीरीचे ठरू शकते. अ‍ॅब्डोमेन म्हणजे पोटाचा पूर्ण भाग. ते उघडल्यावर काय आजार आहे याचे अचूक भाकीत कोणीही करू शकत नाही. म्हणून जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला शल्यचिकित्सकाला ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ द्यावाच लागतो. अर्थात त्यासाठी विश्वासू सर्जन आणि डॉक्टरांवर श्रद्धा ठेवणारा रुग्णही आवश्यक असतो. शस्त्रक्रियेसंदर्भात शिकवली जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे चांगला शल्यचिकित्सक हा फक्त चांगली शस्त्रक्रिया करणारा नव्हे तर शस्त्रक्रिया टाळणारा असतो आणि नेमकी हीच संकल्पना विसरल्यामुळे आज अनावश्यक शस्त्रक्रियांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मला वाटते आज अनावश्यक शस्त्रक्रिया वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे केवळ शल्यचिकित्सक नव्हे तर वैद्यकीय वर्तुळातून गायब झालेला विश्वासू जनरल प्रॅक्टिशनर आहे. आधी कुठलाही पोटदुखीचा रुग्ण हा सर्वप्रथम आपल्या घरातील सदस्य मानल्या जाणाऱ्या जी.पी.कडे जात असे. बहुतांश वेळा ते फॅमिली डॉक्टरांच्या साध्या औषधांमुळेच ते बरे होत. जर तसे नसेल तर फॅमिली डॉक्टर ओळखीच्या प्रामाणिक सर्जनकडे रुग्णाला पाठवत. फोनवर सर्जनशी चर्चा करून कमी पैसे घेण्याची विनंतीही करत. आज मात्र हे चक्र नेमके उलटे फिरते आहे. बरीच वर्षे एकाच डॉक्टरकडे जाऊन फॅमिली डॉक्टर म्हणून त्याला स्वीकारावा इतपत रुग्णांचाही विश्वास राहिलेला नाही आणि नेहमी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांविषयी फॅमिली डॉक्टरलाही आस्था राहिलेली नाही. रुग्ण तपासल्यावर सर्जनकडे पाठवण्यावरच जनरल प्रॅक्टिशनरचा भर असतो. कारण सर्जरी म्हणजे जास्त पैसे आणि जास्त पैसे म्हणजे जास्त कट. फोनवर पैसे कमी करण्याच्या विनंतीऐवजी कट किती मिळणार हीच चर्चा असते. म्हणून अनावश्यक शस्त्रक्रिया टाळण्यासाठी सर्वप्रथम प्रामाणिक विश्वासू फॅमिली डॉक्टर शोधा.
कटसाठी जनरल प्रॅक्टिशनर कशा अनावश्यक शस्त्रक्रिया घडवून आणतात याच्या एका अनुभवानंतर मी थक्क झालो. एका जी.पी.ने डिलीवरीसाठी एका महिलेला स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या माझ्या बंधूकडे आणले. डिलीवरी सुरू झाल्यावर खुद्द जी.पी.ने ‘डॉक्टर सिझेरियन करा’ असा हट्ट धरला. त्यावर सिझेरियन करणे गरजेचे नाही, दहा मिनिटांत नॉर्मल डिलीवरी होईल असे माझ्या बंधूने डॉक्टरला ठामपणे सांगितल्यावर त्या डॉक्टरने चक्क स्वत:चा रुग्ण डिलीवरी टेबलवरून खाली उतरवला आणि दुसऱ्या रुग्णालयात नेऊन त्या स्त्रीचा सिझेरियन सेक्शन करून घेतला.
अनावश्यक शस्त्रक्रियांचा विचार करताना शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरणही करावे लागेल. शहरी भागात आरोग्य क्षेत्र हे सध्या गुंतवणुकीसाठी एक सर्वोत्तम दालन मानले जाते आहे. ‘हेल्थ इंडस्ट्री’ ही नवी संकल्पना जन्माला आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणेच नव्हे तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व काही तालुका पातळीवरही कॉपरेरेट हॉस्पिटलचे पीक आले आहे. या कॉपरेरेट रुग्णालयातील डॉक्टरांना दर महिन्यांची टार्गेट्स दिली जातात. अमूक एका महिन्यात एवढय़ा अ‍ॅडमिशन्स, एवढय़ा तपासण्या, एवढय़ा शष्टद्धr(२२९क्रिया, सीझनमध्ये त्यात दुपटीने वाढ असे सगळे ठरलेले असते. ही टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी या रुग्णालयांकडे उत्तमोत्तम मार्केटिंग स्ट्रॅटजीज आहेत आणि रुग्णही त्यांना बळी पडतात. या रुग्णालयांमध्ये स्वच्छता, हॉस्पिटॅलिटी उत्तम असते हे खरे असले तरी अनावश्यक शस्त्रक्रियांचे प्रमाणही जास्त असते. तुमच्या खिशात चार पैसे असताना तुम्ही उगीचच सरकारी दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रियांच्या वेटींग लिस्टमध्ये अडकावे असे नाही, पण कॉपरेरेट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून घेण्यापूर्वी कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालय किंवा सरकारी दवाखान्यातील ज्येष्ठ सर्जनचे सेकंड ओपीनियन जरूर घ्यावे. शासकीय आरोग्य सेवेवर कितीही टीका झाली तरी अजूनही शासकीय महाविद्यालयांमध्ये अनावश्यक शस्त्रक्रिया सहसा होत नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो. पुण्यामध्ये अशा काही ज्येष्ठ सर्जनने सेकंड ओपिनियन क्लीनिकचा प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन के.ई.एम., सायन, जे.जे., बी.जे.सारख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सधन वर्गासाठी थोडी जास्त फी आकारून सेकंड ओपिनियन क्लीनिक्स सुरू करावीत. त्यातून अनावश्यक शस्त्रक्रिया तर टळतीलच व शासकीय महाविद्यालयांचा महसूलही वाढेल.
रुग्ण तपासल्यावर सर्जनकडे पाठवण्यावरच जनरल प्रॅक्टिशनरचा भर असतो. कारण सर्जरी म्हणजे जास्त पैसे आणि जास्त पैसे म्हणजे जास्त कट. फोनवर पैसे कमी करण्याच्या विनंतीऐवजी कट किती मिळणार?
ग्रामीण भागातील मानसिकता वेगळी आहे. बऱ्याचदा ग्रामीण भागात मोफत आहे, कमी खर्चात आहे म्हणून शस्त्रक्रीया रुग्ण स्वत:हून करून घेतात. शिर्डीतील एका डॉक्टरांनी केवळ पाच हजारात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्टेटेक्टोमी) जाहीर केली. या जाहिरातीला बळी पडून २५-२६ वर्षांच्या विवाहित मुलींना साध्या पोटदुखीसाठी स्वत:चे गर्भायश काढून घेतले. जळगावमध्ये कुठल्या सर्जनने किती गर्भाशय काढले याविषयी इतकी स्पर्धा आहे की खरोखरीच जळगाव शहरात किती स्त्रियांचे गर्भाशय शिल्लक आहेत हा संशोधनाचा विषय ठरेल. ग्रामीण भागात बऱ्याचदा गैरसमजांपोटी शस्त्रक्रिया करून घेतल्या जातात.
अनावश्यक शस्त्रक्रियांपैकी अ‍ॅपेंडीसेक्टोमी (अंपेडिक्स काढण्याची शस्त्रक्रिया), स्त्रियांचे सिझेरियन सेक्शन आणि लेप्रोस्कॉपी म्हणजे दुर्बिणीतून केली जाणारी शस्त्रक्रिया याचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक पोटदुखीचे कारण हे अपेंडिक्सच नसते. अपेंडिक्स शस्त्रक्रियेचे प्रमाण इतके आहे की अपेंडिक्स हे नॉर्मल अवयव असते हेच आम्ही विसरून गेलो आहोत. मानसिक कारणांमुळे पोटदुखीचा त्रास असलेले व अपेंडिक्स काढूनही तो त्रास तसाच राहिलेले कितीतरी रुग्ण माझ्या बघण्यात आहेत. तसेच सिझेरियनचे. सर्वसाधारणपणे सिझेरियनचे प्रमाण ५ ते १० टक्के असायला हवे. हेच प्रमाण आज ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या लेप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्णालयातून लवकर घरी जाण्यासाठी, कामावर लवकर रुजू होता यावे म्हणून केल्या जातात. पण पन्नाशीच्या एखाद्या गृहिणीची उगीचच लॅप्रोस्कोपी करून तिला त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण ओपन शस्त्रक्रियेपेक्षा लेप्रोस्कोपीला जवळपास तिप्पट खर्च येतो.
एका छोटय़ाशा गावातील शिबिरात ८० वर्षांच्या एका वृध्द स्त्रीला एका डोळ्यात मोतििबदूमुळे दृष्टी कमी असल्याचे मला लक्षात आले. मी तिला मोतििबदू शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. त्यावर ती म्हटली- ‘एका डोळ्याने दिसते तेवढंच पुरे. तसेही आता किती वर्षे राहिले आहेत? एका डोळ्याने एक म्हैस दिसते, दोन्ही डोळ्यांनी एकच दिसणार आहे.’ रुग्णाचे वय, गरज, आर्थिक कुवत पाहूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दे- हा मोलाचा उपदेश मला त्या म्हातारीने दिला.
Amolaannadate@yahoo.co.in

2 comments:

भानस said...

आजकाल डॊक्टरकडे जायची भीतीच वाटू लागली आहे. माझ्या लहानपणी डॊ.नेनेकाकांच्या दवाखान्यात गेल्या गेल्या अर्धा आजार पळून जात असे.:)

’आघात ’ चांगला वाटला. अर्थात कान सोनाराने टोचू देत नाहीतर लोहाराने हे थांबणार नाहीच. आजचीच चेंबुरची बातमीच पाहा नं... हॊस्पिटलमधला जंतु्संसर्ग ही ही कित्येक वर्षे दुर्लक्षित बाब आहे.

aruna said...

हल्ली एक नवीन भीती वाटते ओपेरेशन ची. सध्या किदनी सारख्या अवयवान्चा बाजार सुरु झाला आहे. आणी कोणत्या दोच्तोर वर विश्वास ताकावा, अस प्रश्ण पडतो.
खरेच आधीचे फ़ेमिलि दोक्तोर जास्त चान्गले होते.