Translate

Saturday, December 22, 2012

जागतिकीकरणाचा मानवी चेहरा.....

Published: Sunday, December 23, 2012
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, गलथान प्रशासनाने पोखरलेल्या आणि विकासाच्या बहुतेक आघाडय़ांवर जगाच्या खूप मागे पडलेल्या आपल्या देशाचा अभिमान वाटावा असे प्रसंग हल्ली दुर्मीळच झाले आहेत. म्हणून अशा एका प्रसंगानेच सुरुवात करावीशी वाटते. 'चेंज फॉर बेटर' या इंग्रजी त्रमासिकाच्या मुंबईतील प्रकाशन समारंभात २३ ऑक्टोबर २०१० रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलेला हा प्रसंग. प्रकाशनाच्या काहीच दिवस आधी ते इंग्लंडमध्ये असताना घडलेला. रतन टाटा यांचा इंग्लंडमध्ये जाहीर सत्कार होत होता. तो स्वीकारायला टाटा स्टेजवर गेले, तेव्हा शेजारच्याच खुर्चीत बसलेला एक इंग्रज गृहस्थ माशेलकरांना म्हणाला, ''लक्षात घ्या, ज्याचा आम्ही आता सत्कार करतो आहोत तो उद्योगपती आजचा ब्रिटनमधला खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा रोजगारनिर्माता आहे.'' हे सांगून मुंबईतल्या त्या प्रकाशन समारंभात माशेलकर पुढे म्हणाले, ''ज्या ब्रिटनचे आम्ही दीडशे वर्षे गुलाम होतो, त्या ब्रिटनमध्ये सर्वात जास्त नोक ऱ्या देणारा माणूस एक भारतीय आहे, माझा देशबांधव आहे, याचा मला त्या क्षणी प्रचंड अभिमान वाटला. एकेकाळी आमच्यावर राज्य करणाऱ्यांना आज आम्ही नोकरीवर ठेवत होतो. ब्रिटिश करत होते तो जणू फक्त टाटांचा नव्हे, तर संपूर्ण भारताचाच सन्मान होता.'' आपल्या खचलेल्या अस्मितेला उभारी देणारे असे क्षण आपल्या वाटय़ाला वरचेवर यायला हवेत. त्यासाठी आपल्या बाहूंना बळ देण्याचे सामथ्र्य रतन टाटा यांच्या वारशात आहे.





रतन टाटांनी २५ मार्च १९९१ रोजी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी जेआरडी टाटांसारख्या दिग्गजाचा वारसा त्यांना कितपत पेलेल, याविषयी अनेकांना शंका होती. टाटांचे सर्वात मोठे भागधारक शापूरजी पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यावसायिक होते. रुसी मोदी, नानी पालखीवाला, दरबारी सेठ वगैरेंसारखे महारथी वेगवेगळ्या टाटा कंपन्या स्वतंत्रपणे सांभाळत होते. जेआरडींच्या पश्चात ही सर्व मंडळी रतन टाटांना निष्प्रभ करतील, कदाचित उद्योगसमूहाची शकलेही पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. सुरुवातीला काही सहकारी डोईजड झाले, पण हळूहळू रतन टाटांनी त्यांच्यावर मात केली. नानी पालखीवालांची प्रकृती अचानक ढासळल्याने ते निवृत्त झाले, तर शापूरजी पालनजींनी आपली पारंपरिक तटस्थता कायम राखत दैनंदिन व्यवस्थापनापासून दूर राहणेच पसंत केले. 'टाटा' नावाच्या वापरासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी 'टाटा सन्स' या मूळ कंपनीला दरवर्षी रॉयल्टी द्यायची प्रथा रतन टाटांनी समूहात प्रथमच सुरू केली. प्रत्येक कंपनीतील टाटा सन्सचे शेअर होल्डिंग वाढवून त्यांनी ते किमान २६ टक्क्य़ांवर आणले. या व अशा इतरही काही धोरणांनी त्यांनी समूहाची एकता, एक समूहओळख (ब्रँड आयडेंटिटी) कायम राखली. इतर भारतीय उद्योगसमूहांमध्ये गेल्या वीसेक वर्षांत झालेल्या फाटाफुटीच्या पाश्र्वभूमीवर रतन टाटांचे हे यश भरीव आहे. सर्वाना बरोबर घेऊन पुढे जाणे हा त्यांच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
अर्थव्यवस्थेत बॅलन्सशिट हीच प्रमाणभाषा चालते व त्या आघाडीवरही रतन टाटांनी उत्तम यश संपादन केले. उमेदवारीच्या आरंभाला नेल्को व एम्प्रेस मिलच्या पुनरुज्जीवनात व नंतर टाटा फायनान्सच्या बाबतीत त्यांना अपयश आले होते. परदेशातील विस्तारानंतर टाटा स्टील व टाटा मोटर्सचे शेअर्स पार घसरले होते. पण जिद्दीने बाजी लढत त्यांनी हे अपयशाचे डाग धुऊन काढले. आपल्या प्रमुखपदावरील २१ वर्षांत त्यांनी टाटा समूहाची वार्षिक उलाढाल ४० पटींनी वाढवून १०० बिलियन डॉलर्सवर नेऊन पोहोचवली. एकटय़ा टीसीएसचे बाजारमूल्य आज अडीच लाख कोटी रुपये इतके प्रचंड आहे. पुन्हा हे सर्व फारसा गवगवा न करता, भाषणबाजी न करता, चिकाटीने आपले काम करत राहत त्यांनी साधले.
त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाच्या संदर्भात नॅनोचे उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. नॅनोचे मोठे श्रेय प्रकल्प प्रमुख या नात्याने पुण्याच्या गिरीश वाघ या तरुण इंजिनीअरकडे जाते, हा आपल्या मराठी वाचकांच्या दृष्टीने एक सुखद योगायोग आहे. सर्वसामान्य भारतीयाला परवडेल अशी मोटार बनवायचे स्वप्न रतन टाटांनी पाहिले आणि तिची किंमत फक्त एक लाख रुपये असेल, असे २००३ साली त्यांनी जाहीरही केले. यासाठी त्यांनी ५०० जणांचा एक खास गट तयार केला आणि त्याचे नेतृत्व गिरीश वाघ यांच्यावर सोपवले. नॅनोच्या मार्गात अनंत अडचणी आल्या. कच्चा माल अधिकाधिक महाग होत गेला. मोटारीसाठी लागणारे सुमारे २००० सुटे भाग वेगवेगळ्या पुरवठादारांकडून कमीत कमी खर्चात बनवून घ्यायचे होते. राजकीय हेतूंनी केल्या गेलेल्या हिंसक आंदोलनामुळे जवळजवळ पूर्ण उभारला गेलेला बंगालमधील सिंगूर इथला कारखाना गुजरातमधल्या सानंद येथे हलवावा लागला. दीड हजार कोटी रुपये अक्षरश: पाण्यात गेले. पण या सर्व अडचणींवर मात करत नॅनो तयार झाली आणि एक लाख रुपयात बाजारात आली. 'अ प्रॉमिस इज अ प्रॉमिस' हे आता सुप्रसिद्ध झालेले आपले वाक्य उच्चारत रतन टाटांनी वचनपूर्ती केली. नॅनोमध्ये काही तांत्रिक कमतरता आजही आहेत, पण त्या दूर करण्याचे प्रयत्नही शर्थीने सुरू आहेत. स्वत:ची स्वतंत्र मोटार तयार करण्याचे तंत्रज्ञान आज जगातल्या पंधरा-वीस देशांकडेच आहे. खरे तर नॅनो हा भारतीय उद्योगक्षेत्राचा एक मानबिंदू मानायला हवा. परंतु दुसऱ्याचा तेजोभंग करण्यातच स्वत:चे कर्तृत्व मानणाऱ्या विचारवंतांची आपल्याकडे कमतरता नाही. देशी टीकाकारांच्या तुलनेत 'दि फायनान्शियल टाइम्स' या इंग्लंडमधील दैनिकाने केलेले नॅनोचे पुढील मूल्यमापन अधिक मर्मग्राही आहे.. ''एक आधुनिक देश बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचे एखादे प्रतीक जर कुठले असेल, तर ते आहे नॅनो. लक्षावधी भारतीयांची समृद्धीची स्वप्ने नॅनोमध्ये सामावलेली आहेत.''
शेवटी रतन टाटा यांनी जपलेल्या मानवी मूल्यांविषयी लिहायला हवे. 'दि इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत जेआरडींचे चरित्रकार आर. एम. लाला म्हणाले होते, ''रतनच्या नेमणुकीनंतर दोनच आठवडय़ांनी- ५ एप्रिलला मी जेआरडींना विचारलं, 'रतनची नेमणूक त्याच्या प्रामाणिकपणामुळे केलीत का?' जेआरडी उत्तरले, 'नाही, तसं नाही म्हणता येणार! कारण त्याचा अर्थ इतर उमेदवार प्रामाणिक नव्हते असा होईल.' मग क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, 'मला वाटतं तो इतरांपेक्षा अधिक माझ्यासारखा असेल.' आज हयात असते तर जेआरडींना आनंद वाटावा अशीच रतन टाटा यांची कारकीर्द ठरली आहे. मध्यंतरी टेलिकॉम स्पेक्ट्रम (टु-जी) भ्रष्टाचाराच्या संदर्भात टाटांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, पण तो पार फसला. एकंदरीत टाटा समूहाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल असे मूल्य रतननी जेआरडींप्रमाणेच उत्तम जपले याविषयी फारसे दुमत होणार नाही. रतन यांच्या वडिलांचा- नवल टाटा यांचा उल्लेखही इथे करायला हवा. जीनिव्हा येथे भरणाऱ्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अधिवेशनाला दरवर्षी नवल टाटा हजर असत. उद्योगक्षेत्राने व्यापक देशकार्यातही सहभागी व्हायला हवे, अशी त्यांची भूमिका होती आणि त्याच भूमिकेतून त्यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. सामाजिक जाणीव रतन यांच्या रक्तातच आहे.
प्रसिद्धीपराङ्मुख, बुजऱ्या आणि काहीशा अलिप्त अशा स्वभावामुळे या उद्योगपतीच्या मनाचा एक हळवा कोपरा जगापुढे फारसा कधी आला नाही. लाला यांनी सांगितलेल्या दोन आठवणी त्यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर रतननी अमेरिकेतच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला होता. लॉस एंजेलिसमध्ये त्यांनी फ्लॅटही घेतला होता. टाटा उद्योगसमूहातील करिअर १९६२ साली कुठेही दृष्टिक्षेपात नव्हती. लाला लिहितात - ''पण भारतात एक अशी व्यक्ती होती, जी त्यांची सर्वात लाडकी होती. ती म्हणजे त्यांची आजी. आणि जेव्हा तिने परत यायला सांगितले तेव्हा त्यांनी तिची आज्ञा मानली.'' (संदर्भ : Finding a purpose in life- हार्पर कॉलिन्स, २००९ पृष्ठ : २८) आईच्या संदर्भातली आठवण तर अधिकच बोलकी आहे. ''टाटा इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डिरेक्टरपदी नेमणूक झाल्याला तीन महिने उलटले होते. रतनच्या आई सुबू यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. त्या अमेरिकेतील रुग्णालयामध्ये दाखल होत्या. रतनपुढे खूप कठीण पर्याय होता. एकीकडे करिअरमधली मोठी संधी होती, तर दुसरीकडे हॉस्पिटलमधली आई. रतननी आईला सोबत करायचं ठरवलं. ते अमेरिकेला गेले आणि शेवटचे तीन महिने त्यांनी हॉस्पिटलमधल्या आईला सोबत दिली. त्याची आठवण काढत रतन म्हणाले, 'शेवटी आयुष्यात एकुलती एकच आई असते तुम्हाला!' करिअरच्या ऐन भरात असलेले आणि इतक्या महत्त्वाच्या पदावरचे किती भारतीय आपल्या आजारी आईसाठी हे करतील?
एक व्यक्तिगत आठवण.. मे १९९१ मधली. तब्बल दोन तास जेआरडींशी गप्पा मारायचा योग आला. आम्ही पाचजण होतो. केकू गांधी, राहुल देव, उषा मेहता, अलेक पदमसी आणि मी. आयुष्यातला एक अविस्मरणीय असाच तो प्रसंग होता. नियत वेळेपेक्षा खूपच जास्त गप्पा लांबल्या. बॉम्बे हाऊसमधील जेआरडींच्या कार्यालयातून आम्ही बाहेर आलो तो स्वागतकक्षात रतन बसलेले. जेआरडींनी आमची त्यांच्याबरोबर एकेक करत ओळख करून दिली. आम्ही बाहेर यायची तब्बल पंधरा मिनिटे रतन वाट पाहत होते. प्रमुखपदाची सूत्रे त्यांनी हाती घेऊन दोन महिने लोटले होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यात वैताग किंवा नाराजीचा लवलेशही नव्हता. साधेपणा म्हणतात तो हा!
सर्वाना बरोबर घेऊन जायची वृत्ती, व्यावसायिक गुणवत्ता, मोठे धोके पत्करायची तयारी, जागतिक भान हे रतन टाटांचे विशेष उद्याच्या भारतासाठी महत्त्वाचे आहेतच; पण त्याचबरोबर प्रगतीची गरुडझेप घेत असतानाच मानवी मूल्ये कशी जपायची, याचा त्यांनी घालून दिलेला धडाही महत्त्वाचा आहे. टाटा उद्योगसमूहाला जागतिक पातळीवर न्यायचे रतन टाटांचे स्वप्न होते. आणि ते स्वत: या जागतिकीकरणाचा मानवी चेहरा होता.

No comments: