Translate

Sunday, December 23, 2012

तिसरे युग


सरकारप्रधान विकासाची विचारप्रणाली सर्वव्यापक असलेल्या काळात  जेआरडींची सारी कारकीर्द बहरली. निखळ बाजारपेठीय स्पर्धेची आणि  खासगी उद्यमशीलतेची महत्ता
शिरोधार्य मानणार्या  विचारपर्वादरम्यान रतन टाटा यांच्या  प्रगल्भ कर्तबगारीला  दशदिशा मोकळ्या मिळाल्या.  आता, ‘सरकारआणि बाजारपेठया दोन्ही संस्थांच्या  अंगभूत र्मयादांची प्रचीती  अनुभवलेल्या सध्याच्या टप्प्यावर  टाटा उद्योगसमूहाची सूत्रे  सायरस मिस्त्री  हातात घेणार आहेत.
प्रत्येक युगातील पिढीला  तिचा तिचा स्वतंत्र मंत्र जपावा लागतो.  जेआरडींची जागा घेण्याचे स्वप्नदेखील मी कधी  पाहिले नाही आणि  आताबी युवर ओन सेल्फहेच  मी सायरसला सांगतो आहे’,  असे रतन टाटा  अलीकडेच म्हणाले.  त्यामागील सूत्र हेच असावे का



तब्बल १४४ वर्षांची प्रदीर्घ आणि देदिप्यमान परंपरा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुराटाटाआडनाव नसलेल्या आणि केवळ ४४ वर्षांचे वय असलेल्या एका तरुण व्यक्तीकडे सोपविली जाणे हा निव्वळ योगायोग मानायचा की, त्याहीपलीकडे एका अतिशय मोठय़ा अशा मन्वंतराचे सूचन या सत्तापालटाद्वारे घडते, या प्रश्नाचे उत्तर देता येणे फार कठीण आहे.
जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा उद्योगसमूहाची सूत्रे रतन टाटा यांनी २२ वर्षांपूर्वी स्वीकारली त्या वेळीही साधारणपणे अशाच प्रकारचा प्रश्न अनेकांच्या मनात उमटलेला होता. रतन टाटा हेच जेआरडींचे उत्तराधिकारी असतील, ही बाब त्या वेळी बर्याच आधी ठाऊक झालेली होती. मुळात, टाटा घराण्यातीलच असल्याने टाटांचे उद्योगविषयक तत्त्वज्ञान आणि व्यावसायिक मूल्ये यांचा वारसा नव्याने शिकण्याचा सवाल रतन टाटा यांच्याबाबतीत उद्भवलाच नव्हता.
आता, रतन टाटा यांच्याकडून सायरस मिस्त्री यांच्याकडे सूत्रांचे हस्तांतरण होत असताना नेमका हाच मुद्दा कळीचा ठरला. किंबहुना, ‘‘टाटांच्या मूल्यचौकटीचा परिचय, त्या मूल्यांबाबतची आस्था आणि त्या मूल्यव्यवस्थेबाबत बांधिलकी असणार्या व्यक्तीचाच शोध सुरू असल्याने माझा वारस सापडण्यास अंमळ वेळ लागतो आहे’’, अशा आशयाचे उद्गार दस्तुरखुद्द रतन टाटा यांनीच काही वर्षांपूर्वी काढलेले होते.
१४४ वर्षांचा प्रदीर्घ वारसा, जेआरडी आणि रतन या टाटा घराण्यातील दोन युगपुरुषांचे उदंड संचित आणि पुन्हा एकवार नव्या वळणावर येऊन ठेपलेले वैश्विक स्तरावरील आर्थिक-औद्योगिक वास्तव यांचे पाथेय बरोबर बाळगतच सायरस मिस्त्री यांना या पुढील काळात त्यांचा मार्ग धुंडावा लागणार आहे. हाही एक योगायोगच मानायला हवा.
बरोबर २२ वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था आणि टाटा उद्योगसमूह या दोघांच्या मार्गक्रमणामध्ये एक निर्णायक वळण उद्भवले. उदारीकरणाच्या पर्वाची बाळपावले भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रांगणात १९९१ मध्ये उमटावयास प्रारंभ होत असतानाच टाटा उद्योगसमूहाच्या इतिहासात स्वत:ची नाममुद्रा कोरण्यासाठी रतन टाटा यांनी मूळाक्षरे गिरवायला सुरुवात केली. अर्थकारणाच्या व्यवस्थापनाशी निगडित तेथवरच्या तत्त्वज्ञानात मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडून येण्याची ती सुरुवात होती. साहजिकच, टाटा उद्योगसमूहाची व्यावसायिक नीती, कार्यशैली, रचना आणि मूल्यचौकट यांची प्रस्तुतता बदलत्या आर्थिक-औद्योगिक पर्यावरणाच्या चौकटीत पुन्हा एकवार जोखून तिच्यात आवश्यक ती पुनर्मांडणी घडवून आणण्याची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर १९९१ मध्ये येऊन पडली.
आज, थोड्याफार फरकाने सायरस मिस्त्री यांना तेच उत्तरदायित्व पेलावे लागणार आहे. स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक-औद्योगिक उभारणी आणि टाटा उद्योगसमूहाचा विस्तार स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे साडेचार दशकांदरम्यान हातात हात घालूनच होत राहिला. साहजिकच, देशाच्या आर्थिक-औद्योगिक विकासाचा प्राधान्यक्रम आणि टाटा उद्योगसमूहाची विस्तारविषयक व्यूहरचना यांत विसंवाद निर्माण होण्याच्या शक्यता मुळातच निर्माण झाल्या नाहीत. जेआरडी टाटा आणि पंडित नेहरू या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना एकमेकांबाबत वाटणारा आदर, विश्वास आणि जिव्हाळा यांचाही वाटा त्यात होताच.
भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जे कल्याणप्रद तेच टाटा उद्योगसमूहाच्या विकासासाठीही उपकारक’, इतक्या सोप्या आणि थेट शब्दांत जेआरडींनी देशाची आर्थिक-औद्योगिक भरभराट आणि टाटा उद्योगसमूहाचे व्यावसायिक उन्नयन यांच्यातील जैविक नाते अनेक वर्षांपूर्वी स्पष्ट केलेले होते. त्यामुळे, नवभारताच्या उभारणीसाठी जे जे करणे आवश्यक आहे ते ते करण्यात टाटा उद्योगसमूह अग्रेसर असला पाहिजे या व्यावसायिक मूल्याचा अवलंब जेआरडींनी त्यांच्या कार्यकाळात कसोशीने केला. मिठापासून सीमेंटपर्यंत आणि विमानांपासून विजेपर्यंंत टाटा उद्योगसमूहाचा ठसा जेआरडींच्या धुरीणत्वाखाली सर्वत्र उमटला त्यामागील विचारव्यूह होता तो नेमका तोच. असा अस्ताव्यस्त विस्तारलेला टाटा उद्योगसमूहाचा पसारा जेआरडींनी त्यांच्या वारसाच्या हाती सुपूर्त केला.
मात्र त्या वेळी जागतिक स्तरावरील श्रमविभागणी, उद्योगांच्या विकास-विस्तारविषयक कल्पनांची चौकट आणि वैश्विक अर्थव्यवस्थेची वाटचाल एका नवीन वळणावर येऊन पोहोचलेली होती. औद्योगिक घराण्यांनी उद्योगांच्या शक्य तितक्या सगळ्या क्षेत्रांत आपापले तांब्याभांडे ठेवून देण्याची विचारसरणी मागे पडून उद्योगसमूहाच्या गाभा क्षमतांचे (कोअर कॉम्पिटन्सीज्) सक्षमीकरण घडवून आणण्याची विचारप्रणाली सर्वत्र स्थिरावत होती. टाटा उद्योगसमूहाने पूर्वापार जपलेल्या मूल्यव्यवस्थेची बूज राखत असतानाच जागतिक स्तरावरील या बदलत्या प्रवाहांना उद्योगसमूहाचे दरवाजे खुले करण्याचे आव्हान रतन टाटा यांच्यासमोर होते. हे वळण अचूक हेरणे आणि त्या वळणाला खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, वारसाहक्काने आपल्याकडे आलेल्या एका विशाल औद्योगिक साम्राज्याला सिद्ध करणे हा रतन टाटा यांच्या गेल्या दोन दशकी यशस्वी कारकीर्दीचा गाभा होय. वाहननिर्मिती उद्योगात टाटांनी कमावलेल्या संचिताचे संवर्धन घडवून आणत असतानाच माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाधारित उद्योग, वीजनिर्मिती, विमानवाहतूक, दूरसंचार यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आपल्या औद्योगिक घराण्याची सद्दी निर्माण करून दाखवणे यांत रतन टाटा यांच्यातील दूरदश्री, कल्पक आणि प्रगल्भ नवसर्जकाचे दर्शन घडते.
एखादा उद्योजक कितीही कर्तबगार आणि कल्पक असला तरी त्याच्या द्रष्टेपणाला सरकारी सहमतीची जोड मिळेलच याची खात्री नसते. नेहरू आणि गांधी घराण्यांशी व्यक्तिगत स्तरावर उत्तम संबंध असूनही खुद्द जेआरडींना त्यांच्या हयातीत हा अनुभव अनेक वेळा आलेला होता. त्यामुळे, अगदी आर्थिक पुनर्रचना पर्वातही व्यवहारात सर्वशक्तिमान ठरणार्या सरकारी धोरणांमधील उद्योगव्यवसायपूरक बदलांच्या शक्यतांवर उद्योगसमूहाचे भागधेय विसंबून ठेवण्याऐवजी उदारीकरणाच्या माध्यमातून विस्तारत असलेल्या वैश्विक उद्योगविश्वाच्या विशाल अवकाशात भरारी घेण्याची दृष्टी भारतीय उद्योगांना प्रदान करणे, हे रतन टाटा यांचे दुसरे ठोस कर्तृत्त्व. आजमितीस टाटा उद्योगसमूहाच्या एकंदर उलाढालीपैकी जवळपास दोन तृतीयांश उलाढाल ही समूहाच्या जगभरातील पसार्यातून निर्माण होते. उद्योगांचे संपादन आणि विलीनीकरण धडाक्याने होण्याच्या आजच्या युगात, चहा आणि मोटरींच्या उत्पादनात जगभरात एकेकाळी अग्रेसर असणार्या नामांकित कंपन्या एक भारतीय उद्योग स्वत:च्या पंखांखाली आणू शकतो, हा आत्मविश्वास भारतीय कॉर्पोरेट विश्वाला प्रदान करणे, हे रतन टाटा यांचे खरे चिरस्मरणीय योगदान.
भारतासारख्या विपुल मनुष्यबळ उपलब्ध असणार्या अर्थव्यवस्थेला तिच्या भविष्यकालीन सातत्यपूर्ण आणि संतुलित विकासासाठी केवळ सेवाउद्योग क्षेत्राच्या भरभराटीवर विसंबून राहून चालणार नाही, हे रोकडे वास्तव रतन टाटा यांनी आजवर अनेकानेक व्यासपीठांवरून रोखठोकपणे मांडलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास खर्या अर्थाने सर्वसमावेशक होण्यासाठी वस्तुनिर्माण उद्योगाचे हातपाय औरसचौरस पसरण्यास पर्याय नाही, हे उमगलेले रतन टाटा यांच्यासारखे उद्योगपती अन्य असतीलही; परंतु देशी बाजारपेठेतील विस्तारक्षमतांचे संगोपन-संवर्धन करायचे तर त्या बाजारपेठेच्या गरजांची पूर्तता करणार्या जिनसांबाबत त्यांच्या डिझाइनपासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत आपल्याला एकात्म विचार करणे भाग आहे, हा मंत्र भारतीय उद्योगक्षेत्राला आचरणाद्वारे शिकवण्याची धडपड करणे यांत रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेपण सामावलेले आहे. ‘नॅनोसारखी मोटर वास्वच्छसारखे जलशुद्धीकरण यंत्र यांसारख्या टाटा उत्पादनांकडे आपण या दृष्टीने बघायला हवे.
गेल्या बावीस वर्षांंत कमावलेले हे सारे संचित रतन टाटा आता सायरस मिस्त्री या त्यांच्या उत्तराधिकार्याकडे सुपूर्त करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि एकंदरच आर्थिक पर्यावरण आता पुन्हा एकवार एका नवीन वळणावर येऊन ठेपलेले आहे. ‘सरकारनामक भिडू अर्थकारणात जी कळीची भूमिका बजावत असतो तिची यथार्थ जाणीव 00 पासून उद्भवलेल्या मंदीपायी देशोदेशीच्या अर्थव्यवस्थांना पुन्हा एकवार नव्याने होऊ लागलेली आहे. जेआरडींची सारी व्यावसायिक कारकीर्द सरकारप्रधान विकासाची विचारप्रणाली सर्वव्यापक असलेल्या काळात बहरली. तर, निखळ बाजारपेठीय स्पर्धेची आणि खासगी उद्यमशीलतेची महत्ता शिरोधार्य मानणार्या विचारपर्वादरम्यान रतन टाटा यांच्या ठायीच्या प्रगल्भ कर्तबगारीला दशदिशा मोकळ्या मिळाल्या. आता, ‘सरकारआणिबाजारपेठया दोन्ही संस्थांच्या अंगभूत र्मयादांची प्रचीती अनुभवलेल्या सध्याच्या टप्प्यावर टाटा उद्योगसमूहाची सूत्रे सायरस मिस्त्री हातात घेणार आहेत.
प्रत्येक युगातील पिढीला तिचा तिचा स्वतंत्र मंत्र जपावा लागतो. जेआरडींच्या काळातील व्यवसायसूत्रे रतन टाटांना त्यांच्या कारकीर्दीदरम्यान उपयोगी ठरणार नव्हती. रतन टाटा यांनी राबवलेली व्यवसायप्रणाली सायरस मिस्त्री यांना कितपत उपयुक्त ठरेल, हे कोणी सांगावे?
‘‘
जेआरडींची जागा घेण्याचे स्वप्नदेखील मी कधी पाहिले नाही आणि आताबी युवर ओन सेल्फहेच मी सायरसला सांगतो आहे’’, असे जे प्रांजळ कथन रतन टाटा यांनी अगदी अलीकडच्या एका मुलाखतीदरम्यान केले त्यामागील सूत्र हेच असावे का?

No comments: